06:07pm | Jul 30, 2018 |
सातारा: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनास्थेमुळे स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत लाखो बळी गेले आहेत. 3 ऑगस्ट 2016 रोजी मुंबई-गोवा महामार्गावर महाड-पोलादपूरला जोडणार्या सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन सुमारे 90 वर्षे जुना असलेला पूल वाहून गेल्यामुळे झालेल्या अपघातात प्रवासी बस कोसळून पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली होती. या अपघातात सुमारे 42 प्रवाशांचे हाकनाक बळी गेले होते. या घटनेपासून राज्यशासन खडबडून जागे झाले होते. मात्र ‘नेमेची येतो पावसाळा’ याप्रमाणे राज्यातील जुन्या पुलांचे आणि रस्त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट करुन त्याचा तपासणी अहवाल राज्य शासनाकडे दिला गेला की नाही, याबाबत सरकार दरबारी ‘सस्पेन्स’ असताना परवा बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी महाबळेश्वर येथे सहलीला येत असतानाच आंबेनळी घाटात संरक्षक कठडे नसल्यामुळे ती बस तब्बल 600 फूट खोल दरीत कोसळून सुमारे 30 लोकांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनास्थेमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. हा विभाग अजून किती बळी घेणार? याचे शपथपत्र त्यांनी सादर करावे, अशी मागणी होवू लागली आहे.
ब्रिटीश भारतातून जावून उणीपुरी सत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही आपण आजही ब्रिटीशांच्या मेहरबानीवर जगत आहोत. ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या रस्ते, पुलांचा व इमारतींचा वापर आपण आजही करीत आहोत. सरकारने भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशातील विविध राज्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग ही यंत्रणा अस्तित्वात आणली. प्रत्येक देशाचा विकास हा ज्याच्या त्याच्या दळणवळण व साधनांच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो. आज भारतामध्ये पूर्वीपेक्षा रस्त्यांचे लांबलचक असे जाळे जरुर वाढलेले आहे. एकदा रस्ता तयार झाल्यानंतर त्याच्या डागडुजीकडे ढुंकूनही पाहिले जात नाही. पूर्वी 'लायसन्स' राज होते, आता 'ठेकेदार' राज निर्माण झाले आहे. राज्यातील राष्ट्रीय महामार्गांचीच अवस्था भयावह आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांची अवस्था तर भयाणच आहे. 50 वर्षापूर्वी बांधलेल्या रस्त्यांचे आजतागायत रुंदीकरण करण्यात आलेले नाही. परंतू त्या प्रमाणात रस्त्यावरील वाहतूक मात्र मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्यांवर तर जीव मुठीत घेवून वाहने चालवावी लागतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होवून हाकनाक बळी जात आहेत. ब्रिटीश भारतातून गेल्यानंतर त्यांनी बांधलेल्या पुलांची कालमर्यादा संपलेली आहे, अशी पत्रे राज्यातील अनेक सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाली होती. परंतू खाबुगिरीमुळे या पत्रांनाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालीन अधिकार्यांनी केराची टोपली दाखवली होती.
सातारा जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्ह्यात अनेक ठिकाणी ब्रिटीशकालीन छोटे-मोठे पूल आहेत. यामध्ये संगम माहुली व आरळे पुलाची कालमर्यादा संपलेली आहे. हे पूल कोणत्याही क्षणी ढासळू शकतात. धोम-बलकवडी व कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर कृष्णा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर येत असतो. आरळे येथील पुलाला सुमारे दोन वर्षापूर्वी फार मोठे भगदाड पडले होते. युद्ध पातळीवर ते भगदाड मुजविण्याचे प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले गेले होते. त्यामुळे या मागावरील वाहतूक वाई तालुक्यातील शिरगाव घाटातून व कोरेगावमार्गे वळविण्यात आली होती. त्यामुळे कोरेगावात वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. शिरगाव घाटातही वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते. सुमारे चार महिने हा खेळ सुरु होता. तरीही सातारा-लोणंद मार्गावरील पर्यायी पुलाची व्यवस्था आजपावेतो करण्यात आलेली नाही. संगम माहुली येथील पुलही शेवटच्या घटका मोजत आहे. मल्टीएक्सल वाहने व अवजड वाहनांमुळे हा पूल खिळखिळा झालेला आहे. या पुलाचा एकजरी चिरा निखळला तर सावित्री नदीवरील अपघाताची पुनरावृत्ती याठिकाणी होणार आहे. तिच परिस्थिती आरळे येथील पुलाच्या बाबतीतही आहे. शिव छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रतापगड परिसरातून आंबेनळी घाट जातो. कोकणातून देशात येण्यासाठी या मार्गाचा वापर शिवकालापासून करण्यात येत आहे. आंबेनळी घाटात अजूनही छोटे-मोठे पूल आहेत. मात्र या पुलांचा साधा दगडही निखळलेला नाही. 300-400 वर्षानंतरही हे पूल अभेद्य आहेत. परंतू जुन्या लोकांनी केलेल्या मेहरबानीवर सार्वजनिक बांधकाम विभाग किती दिवस जगणार? आंबेनळी घाट, केळघर घाट, पसरणी घाटांचे विस्तारीकरण, ठिकठिकाणी संरक्षक कठडे बांधणे, दिशादर्शक इत्यादी बसवणे व त्याची वेळच्या वेळी डागडुजी करणे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम आहे, मात्र दरवर्षी निविदा काढल्या जातात, कामाची बिलेही अदा होतात. मात्र तात्पुरत्या व निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच परिस्थिती होत असते.
सावित्री दुर्घटनेनंतर राज्य शासन खडबडून जागे झाले होते. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तात्काळ राज्यातील ब्रिटीशकालीन व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. मात्र या ऑडिटचे पुढे काय झाले, ते बांधकाम मंत्र्यांनाही सांगता आले नाही. सुमारे दोन वर्षे उलटल्यानंतर सावित्री नदीवरील पुलापासून पन्नास किलोमीटरवर असणार्या आंबेनळी घाटात केवळ संरक्षक कठडे नसल्यामुळे 30 जणांना आपले जीव नाहक गमवावे लागले. त्याला जबाबदार कोण? सावित्री आणि आंबेनळी येथील अपघाताला जबाबदार धरुन सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसह संबंधित अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे का दाखल करु नयेत? याबाबतचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी आता द्यायला हवे.
परवा आंबेनळी घाटातील दुर्घटनेनंतर पंतप्रधानांसह कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही श्रद्धांजली वाहिली. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी केवळ श्रद्धांजली वाहून चालणार नाही, तर त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. नाहीतर दरवर्षी सरकारी अनास्था हजारो लोकांचे बळी घेते. हे आता कुठेतरी थांबण्याची गरज आहे. किमान आंबेनळी घाटातील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे उघडोत, हीच खरी श्रद्धांजली. सावित्री व आंबेनळी दुर्घटनेतील मृतांना ठरणार आहे.
-संग्राम निकाळजे
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |